*व्यापारी संघटनेचा एल्गार बाजारपेठ बंद ठेवत उपोषणाला जाहीर पाठिंबा*
*एटापल्ली*
तालुक्यातील प्रमुख रस्त्यांच्या नूतनीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणाला आज मोठा पाठिंबा मिळाला असून एटापल्ली येथील व्यापारी संघटनेने एकमुखी निर्णय घेत संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवत आंदोलनाला जाहीर समर्थन दर्शविले. सकाळपासूनच सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. व्यापाऱ्यांनी प्रत्यक्ष उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेत मागण्यांना रास्त ठरवत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
व्यापारी संघटनेच्या या बंदमुळे शहरातील दैनंदिन व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते. औषध दुकाने व अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आल्या. “रस्त्यांची दुरवस्था ही केवळ नागरिकांची नव्हे तर व्यापाऱ्यांचीही मोठी समस्या आहे. ग्राहक येत नाहीत, माल वाहतूक अडते, अपघात वाढतात, त्यामुळे आंदोलनाला पाठिंबा देणे ही आमची सामाजिक जबाबदारी आहे,”अशी भूमिका व्यापारी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, व्यापाऱ्यांच्या बंदमुळे आंदोलनाला आणखी बळ मिळाले असून प्रशासनावर दबाव वाढताना दिसत आहे. आधीच विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधी यांनी पाठिंबा दर्शविल्यानंतर आता व्यापारी संघटनाही मैदानात उतरल्याने आंदोलन अधिक तीव्र टप्प्यात गेले आहे. उपोषण स्थळी घोषणाबाजी करत लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी उग्र करण्याचा इशाराही देण्यात आला.
एकीकडे आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत असताना दुसरीकडे प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. व्यापारी बंद, लोकप्रतिनिधींच्या भेटी आणि आमरण उपोषणाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनावर निर्णयाचा ताण वाढला असून लवकरच ठोस कारवाई जाहीर होणार का, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता व अपेक्षा निर्माण झाली आहे.
*आंदोलन तीव्र,आजपासून आमरण उपोषणाचा इशारा*
तालुक्यातील प्रमुख रस्त्यांच्या नूतनीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणाची प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने आंदोलनकर्त्यांनी आजपासून उपोषणाचा स्तर वाढविण्याचा निर्णायक इशारा दिला आहे. सतत निवेदने, पाठपुरावा आणि वाढता जनसमर्थन असूनही प्रश्न प्रलंबितच राहिल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी आजपासून आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय जाहीर केला आहे. जोपर्यंत मागण्यांवर लेखी आश्वासनासह ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे सांगत प्रशासनावर नैतिक व लोकशाही मार्गाने दबाव वाढविण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केली आहे
