
‘रावण महाराज’बनले सांगोळा वासियांचे दैवत.
अकोला:- रावण… रामायणातील ‘व्हिलन’, खलपुरूष अशीच या पात्राची आपल्या मनात प्रतिमा. सितेचं अपहरण करणाऱ्या रावणा भोवतीच रामायणाचं मध्यांतर आणि क्लायमॅक्सही फिरतो. वाईट शक्तींचं प्रतिक असलेल्या याच रावणाचं दसऱ्याला दहन केलं जातं. मात्र, अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावात चक्क याच रावणाची पुजा केली जाते. या गावात रावणाची पुजा का केली जाते?… रावणपुजेची अडीचशे वर्षांची या गावाची परंपरा नेमकी आहे तरी काय? पाहूयात…
सांगोळ्यात आहे 250 वर्षांपुर्वीची रावणाची पुरातन मूर्ती
रावणाची मनोभावे पूजा आणि आरती होत असल्याचं पाहून-ऐकून आपल्याला निश्चितच आश्चर्याचा धक्का बसेल… अन तेही कोणत्या दाक्षिणात्य राज्यात नव्हे तर आपल्या महाराष्ट्रात होतं हे ऐकलं तर तुमचा विश्वासही बसणार नाही. मात्र, अकोला जिल्ह्यातल्या सांगोळा गावाने गेल्या अडीच शतकांपासून रावणपुजेची अनोखी परंपरा जोपासली आहे. फक्त परंपराच नाही तर या गावात 250 वर्षांपुर्वीची रावणाची सुंदर आणि सुरेख मुर्तीसुद्धा आहे. पातूर तालूक्यात असलेलं सांगोळा गाव अकोल्यापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. या गावाच्या अगदी सुरूवातीलाच एका मंदिरवजा चौथऱ्यावर रावणाची एक अतिशय सुंदर, रेखीव मूर्ती आहे.
गावात रावणाच्या मुर्तीचं असं झालं आगमन
सांगोळा गावात रावणाच्या मंदिरासोबतच श्रीराम, हनुमान, भवानी देवीचंही मंदिर आहे.. गावाला अगदी लागूनच गावाची जीवन वाहिनी समजली जाणारी मन नदी वाहते. या मूर्तीच्या आगमनामागची कथाही फार रोचक आहे. याच मन नदीच्या काठी ऋषी-मुनीचे आश्रम होते. अडीचशे वर्षांपूर्वी याच नदीच्या काठावर वास्तव्यास असलेल्या असलेल्या एका ऋषीने गावाच्या पश्चिमेस असलेल्या जंगलात तपस्या केली होती. त्यांच्या प्रेरणेने गावात अनेक धार्मिक उपक्रम होत असत. ऋषी मरण पावल्यानंतर गावकऱ्यांनी मुर्तीच्या रूपाने त्यांच्या स्मृती जपण्याचा निर्णय घेतला. एका शिल्पकाराकडे त्यांची मूर्ती घडवण्याचे काम सोपवले गेले. पण त्याच्या हातून घडली ती दशानन रावणाची मूर्ती… दहा तोंडे, काचा बसवलेले वीस डोळे, सर्व आयुध असलेले वीस हात अशी विराट मूर्ती त्याने घडवली. मूर्ती घडवली तिथे दहा फटे असलेले सिंदोळीचे झाड होते. सिंदोळीचे झाड, अवचित घडलेली ही घटना अन त्यातून ‘लंकेश्वराची मूर्ती’ साकारल्या गेल्याचा हा योगायोग श्रद्धाळू ग्रामस्थांनी हेरला आणि गावात लंकेश्वर ‘रावण महाराज’ स्थिरावलेत.ही मूर्ती गावाच्या दुसऱ्या बाजूला ठेवायची होती. मात्र, मूर्ती गावाच्या वेशीवरून समोर हललीच नाही. अन त्यामूळेच गावाच्या सुरुवातीलाच तिची प्रतिष्ठापना करण्यात आली. या आख्यायिकेबद्दल माहिती ही लिखित नसून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत राहते. या घटनेनंतर गेल्या अडीच शतकांपासून ‘रावण महाराज’ सांगोळावासियांचं दैवत बनलं आहे. येथे विजयादशमीला रावणाचे दहन होत नसून त्याची मनोभावे पूजा केली जाते.
रावणाची मूर्ती चोरून नेण्याचा प्रयत्न मात्र ती मूर्ती सरकलीच नाही
सांगोळ्यातील रावणाची ही सुंदर मुर्ती 50-60 वर्षांपुर्वी चोरून नेण्याचा प्रयत्नही झाला. एकदा काही बाहेरच्या लोकं रात्रीच्या वेळी गावात ही मूर्ती चोरून नेण्याकरीता आली होती. मात्र, मोठे प्रयत्न करूनही ती उचललीच न गेल्याने चोरीचा प्रयत्न फसल्याची आठवण गावकरी सांगतात.
‘रावण महाराज’ सांगोळावासियांचं बनले ‘दैवत’.
या गावात रावणाच्या मंदिरासोबत राम, हनुमान आणि इतर देवतांची मंदिरंही आहेत. या देवतांच्या आराधने बरोबरच गावकरी भक्तीभावानं रावणाचीही आराधना करतात. रावणाच्या मूर्तीचं कुतूहल असल्यानं अनेक लोक या मूर्तीच्या दर्शनालाही येतात. वर्षभरातून दसरा आणि रामनवमीला या रावणासाठी गावकरी विशेष आरती आणि सोहळा साजरा करतात. पुढच्या काळात गावात रावणाचे भव्य मंदिर उभारणीचा ग्रामस्थांचा मानस आहे.
रावणदहन न करण्याचा सांगोळावासियांचा आग्रह
दसऱ्याला होणारं रावण दहन थांबावं, असंही आवाहन हे गावकरी लोकांना करतात. कारण, रावण हा सर्वात मोठा शिवभक्त होता. सितेकडे त्यानं कधीही वाईट नजरेनं न बघता तिचा आई म्हणून सन्मानच केल्याचं गावकरी सांगतात. त्यामूळे रावणातील चांगुल पणाला पुजत त्याचा सन्मान केला जावा असं गावकऱ्यांना वाटतं.
मिटकरींची रावणदहन प्रथा बंद करण्याची सरकारकडे मागणी
देशात आणि राज्यात रावणदहनाच्या प्रथेवर बंदी आणण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केली आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावात रावणाची महाआरती केलीय. यावेळी आदिवासी समाज आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होतेय. गेल्यावर्षी आमदार अमोल मिटकरींनी सांगोळा गावातील रावण मंदिराचा जिर्णोद्धार करण्याची भूमिका मांडल्यानंतर देशभरात मोठा गदारोळ निर्माण झाला होताय. त्यांनी गेल्यावर्षी आपल्या आमदार निधीतून 20 लाखांचा निधी मंदिराच्या सभागृह आणि जीर्णोद्धारासाठी दिला होता. यानंतर राज्य आणि देशभरात मोठा गदारोळ उडाला होता. आज परत मिटकरींनी सांगोळ्यात येत रावनदहनाच्या परंपरेवर देशभरात बंदीची मागणी केली आहे. आमदार मिटकरींच्या मागणी नंतर या विषयावरून पून्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
रावणात दुर्गुणा सोबतच फार मोठे सद्गुगुणही होते. मात्र, आजही त्याच्यातील सदगुण करीत देशभर होळी होतेय ते ती दुर्गुणरुपी रावणाचीच… सध्याच्या परिस्थितीत महागाई, दहशतवाद, महिलांवरील अत्याचार, राष्ट्रीय एकात्मतेचे मारेकरी हेच खरे राक्षस आहेत. त्यांच्या रूपातील रावणाचा दहन करण्याची शपथ दसऱ्याला घेत देश बलशाली करण्याची भावनाच खरं ‘सीमोल्लंघन’ ठरेल.