दितवाह’ चक्रीवादळामुळे गडचिरोली-चंद्रपूरमध्ये हलक्या पावसाची शक्यता.
नागपूर:– सध्या ‘दितवाह’ चक्रीवादळाचे प्रमाण श्रीलंकेच्या भागामध्ये सक्रिय आहे. ही प्रणाली सध्या जमिनीवर असल्याने त्याला जास्त बळकटी मिळत नाहीये आणि कोरडे वारे पोहोचत असल्याने ढगाळ वातावरण थोडेसे कमी झाले आहे. मात्र, या वादळामुळे श्रीलंकेत खूप मुसळधार पाऊस झाला आहे. ही सिस्टीम आता उत्तरेकडे सरकत आहे आणि पुन्हा समुद्रात आल्यावर त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.हे चक्रीवादळ उत्तरेकडे जात असताना, ३० नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत ते डीप डिप्रेशन किंवा डिप्रेशन म्हणून चेन्नईच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, या चक्रीवादळाचा आपल्या महाराष्ट्रावरती सध्या तरी कोणताही विशेष प्रभाव नाही.
राज्याच्या बहुतांश भागात थंडी कायम राहणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणचे तापमान १२ ते १५ अंश सेल्सियसपर्यंत राहण्याची शक्यता आहे, तर कोकणात मात्र तापमान तुलनेने जास्त राहील.राज्यात पावसाची विशेष शक्यता नसली तरी, ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबरला काही ठराविक ठिकाणी परिणाम जाणवेल. हवामान विभागाने ३० नोव्हेंबर रोजी चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय, १ डिसेंबर रोजी गडचिरोलीच्या दक्षिण भागातील काही तालुके (जसे अहेरी, एटापल्ली, सिरोंचा किंवा भामरागड) या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात ढगाळ हवामानासह पावसाच्या सरी पाहायला मिळतील. हा पाऊस मुसळधार स्वरूपाचा नसेल आणि राज्याच्या इतर ठिकाणी पावसाची विशेष शक्यता सध्या तरी दिसत नाही.
