
गडचिरोली पोलिसांकडून अटक, नागपूरच्या कारागृहात काढले दिवस.
गडचिरोली:- नक्षल्यांशी संबंध असल्याच्या कथित आरोपामुळे चर्चेत आलेले व अहेरी ठाण्यात दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्यानुसार (यूएपीए) गुन्हा नोंद होऊन अटक झालेले दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी.एन.साईबाबा (५७) यांचे १२ ऑक्टोबरला हृदयविकाराने निधन झाले. तब्बल दहा वर्षे ते तुरुंगात होते. दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी. एन. साईबाबा (४७, रा. दिल्ली, कुंजबर्गल, जिल्हा अल्मोडा, उत्तराखंड), प्रशांत राही (५४, रा. डेहराडून, उत्तराखंड), महेश तिर्की आणि पांडू नरोटे (२७, रा. मुरेवाडा) यांच्यावर बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायदा १९६७ चे कलम १३, १८, २०, ३८, ३९ आणि अहेरी पोलिस ठाण्यात भादंवि कलम १२० (ब) अन्वये मे २०१४ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर जी.एन.साईबाबाला पोलिसांनी दिल्लीतून अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगातच होते.मार्च २०१७ मध्ये साईबाबा यांना या कायद्यांतर्गत अहेरी न्यायालयाने दोषी ठरवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांना नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यानंतर मार्च २०२४ मध्ये नागपूर खंडपीठाने साईबाबा यांच्यावरील आरोप सिद्ध करता आले नाहीत. या कारणास्तव त्यांची निर्दोष मुक्तता केली. कारागृहात असताना त्यांना विविध आजार जडले व प्रकृती खालावत गेली.निर्दोष मुक्त झाल्यानंतरही या आजाराने त्यांची साथ सोडली नाही.अखेर शनिवारी त्यांचे निधन झाले.
मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्दोष म्हणून सुटका.
नक्षलवादाच्या आरोपांखाली साईबाबा यांच्यासह एक पत्रकार तसेच जवाहर नेहरू विद्यापीठाच्या पाच विद्यार्थ्यांना गडचिरोलीच्या सत्र न्यायालयाने २०१७ साली दोषी ठरवलं होतं. त्यानंतर याच निर्णयाला आव्हान दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने साईबाबा यांची निर्दोष म्हणून मुक्तता केली होती.
साईबाबा यांना वयाच्या पाचव्या वर्षी पोलिओ.
साईबाबा हे दिव्यांग होते.वयाच्या पाचव्या वर्षी त्यांना पोलिओ झाला होता. दोन्ही पायांनी चालता येत नसल्याने ते लहानपणापासूनच व्हीलचेअरवर असत. सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर त्यांची प्रकृती खालावल्याच्या कारणावरून जुलै २०१५ मध्ये जामिनावर सुटका झाली होती. यानंतर हायकोर्टाने त्यांचा जामीन रद्द करून त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते.