एटापल्लीला शहरी दर्जा द्या; महावितरणकडे निवेदन
पाणीपुरवठा सभापती राहुल कुळमेथे, नगरसेवक राघवेंद्र सुलवावार यांची मागणी
एटापल्ली : तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या एटापल्ली शहराचा महावितरणच्या नोंदीत अद्याप ग्रामीण भागात समावेश असल्यामुळे वीज वितरण व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे. वाढती लोकसंख्या व झपाट्याने होत असलेला नागरी विस्तार लक्षात घेता शहरासाठी उपलब्ध मनुष्यबळ अपुरे ठरत असून नागरिकांना वारंवार वीजपुरवठ्याच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्या एटापल्ली शहरासाठी केवळ एक लाईनमॅन व एक सहाय्यक लाईनमॅन कार्यरत असल्याने संपूर्ण शहराची जबाबदारी मर्यादित कर्मचाऱ्यांवर येत आहे. शहरात शासकीय कार्यालये, व्यापारी आस्थापना तसेच मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढत असल्याने वीज व्यवस्थापनासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर नगर पंचायत एटापल्लीचे पाणीपुरवठा सभापती राहुल कुळमेथे तसेच माजी बांधकाम सभापती व नगरसेवक राघवेंद्र सुलवावार यांनी महावितरणच्या उपअभियंता कार्यालयात निवेदन सादर केले असून, एटापल्ली उपविभागातील विद्यमान ग्रामीण वर्गीकरण रद्द करून शहरी वर्गीकरणाचा दर्जा देण्याची मागणी केली आहे.
शहरी वर्गीकरण झाल्यास आवश्यक तांत्रिक व सहाय्यक कर्मचारी उपलब्ध होऊन वीजपुरवठा अधिक कार्यक्षम व सुरळीत होईल, असा विश्वास निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे.
