
राज्यातील 1 लाख शाळांतील 5 लाख शिक्षकांमार्फत 1 कोटी विद्यार्थ्यांपर्यंत मूल्याधारित शिक्षण पोहोचविण्यात येणार.
तातडीने सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्याचे निर्देश.
मुंबई:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र शासन आणि शांतीलाल मुथ्था फाउंडेशन यांच्यामध्ये ‘मूल्यवर्धन 3.0 उपक्रम‘ राबविण्याच्या अनुषंगाने सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.
या उपक्रमांतर्गत राज्यातील 1 लाख शाळांतील 5 लाख शिक्षकांमार्फत 1 कोटी विद्यार्थ्यांपर्यंत मूल्याधारित शिक्षण पोहोचविण्यात येणार आहे. शिक्षकांना प्रशिक्षण, उपक्रम पुस्तिका आणि मूल्य आत्मसात करण्यावर भर दिला जाणार आहे. हा देशातील सर्वात मोठा मूल्यशिक्षण उपक्रम ठरणार आहे.
याप्रसंगी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दादाजी भुसे, शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनचे संस्थापक शांतीलाल मुथ्था, प्रधान सचिव, शालेय शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक व इतर मान्यवर उपस्थित होते.