जनार्दन नल्लावार एटापल्ली तालुका प्रतिनिधी
*रस्ते दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर,एटापल्ली पत्रकार संघटनेचे आंदोलन*
एटापल्ली
तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था व प्रशासनाच्या दीर्घकाळ चाललेल्या दुर्लक्षाविरोधात अखेर पत्रकार संघटना एटापल्ली आक्रमक झाली असून आज दिनांक 9 फेब्रुवारी 2026 पासून सार्वजनिक बांधकाम विभाग, एटापल्ली कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे तालुक्यातील रस्ते प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
एटापल्ली–देवदा–गडचिरोली हा जिल्हा मुख्यालयाकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग तसेच एटापल्ली–जारावंडी व एटापल्ली–हेडरी–गट्टा हे तीनही प्रमुख रस्ते सध्या पूर्णतः खड्डेमय व जीर्ण अवस्थेत आहेत. या मार्गावरून दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी, रुग्ण व शासकीय कर्मचारी प्रवास करीत असतात. मात्र रस्त्यांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की लहान-मोठे अपघात नित्याचे झाले असून अनेकांना जीव गमवावा लागल्याची गंभीर बाब समोर आली आहे
विशेषतः गर्भवती महिला, नवजात बालके, वृद्ध व गंभीर रुग्णांना तालुका व जिल्हा रुग्णालयात नेताना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. खड्डेमय रस्त्यांमुळे रुग्णवाहिकेतच रुग्णांची प्रकृती बिघडत असल्याच्या घटना घडल्या असून नागरिकांच्या जीविताशी सुरू असलेला हा खेळ थांबविण्याची मागणी जोर धरत आहे
या संदर्भात पत्रकार संघटना व नागरिकांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच उपविभागीय प्रशासनाकडे यापूर्वीच लेखी निवेदने सादर करण्यात आली होती. दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी संबंधित विभागास अर्ज देऊन दोन महिन्यांचा अवधी देण्यात आला होता. मात्र कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे
दरम्यान, आज 9 फेब्रुवारीपासून सुरू होणारे साखळी उपोषण बेमुदत स्वरूपाचे असून रस्त्यांच्या तात्काळ दुरुस्ती व नुतनीकरणाचा ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून, आता तरी शासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार का, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे
