*_केंद्राचा अर्थसंकल्प दूरदृष्टीपूर्ण व सर्वांगीण विकास साधणारा – मा. खा. अशोक नेते_*
गडचिरोली | दि.०१ फेब्रुवारी २०२६
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाच्या दूरदृष्टीपूर्ण व सर्वांगीण विकासाचा ठोस आराखडा असून, या अर्थसंकल्पातून शेतकरी, महिला, आदिवासी तसेच ग्रामीण व औद्योगिक क्षेत्राला नवसंजीवनी मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री मान. अशोकजी नेते यांनी व्यक्त केले.
या अर्थसंकल्पात शेतकरी बांधवांसोबतच पशुपालन व मत्स्यव्यवसायाला विशेष प्रोत्साहन देण्यात आले असून, ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने सरकारची ठाम भूमिका स्पष्ट होते. अनुसूचित जमातीच्या नागरिकांच्या सर्वांगीण उत्थानासाठी केंद्र सरकार नेहमीच सकारात्मक असून, यावर्षी त्यांच्यासाठी आणखी काही नवीन व प्रभावी योजना राबविण्यात येणार असल्याचे संकेत या अर्थसंकल्पातून मिळतात, असेही मा.खा.डाँ. नेते यांनी नमूद केले.
औद्योगिक विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यासाठी हा अर्थसंकल्प विशेष महत्त्वाचा ठरणार असून, नवीन औद्योगिक कॉरिडॉरच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील तसेच सामान्य नागरिकांसाठी नवीन व्यवसायाची दारे खुली होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महिला सक्षमीकरणाला अधिक बळ देणाऱ्या तरतुदी, पायाभूत सुविधा विकासाला मिळणारी चालना आणि दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य साधणाऱ्या योजनांमुळे देशाच्या विकासाला नवी दिशा मिळेल. एकूणच हा अर्थसंकल्प ‘विकसित भारत’ संकल्पनेला साकार करणारा असून, देशाचा समतोल व दूरदृष्टीपूर्ण विकास निश्चितच साधला जाईल, यात शंका नाही, असे मत मा. खा. अशोक नेते यांनी व्यक्त केले.
