
गडचिरोली:- कोरची तालुक्यात मागील पाच दिवसांत सहा तेंदू पत्ता मजूरावर रानडुकराने हल्ला करून जखमी केले आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या रानडुकरांमुळे तेंदूपत्ता मजूरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दि. 11 एप्रिल रोजी सकाळच्या दरम्यान जवळच असलेल्या जंगलात तेंदू पाने संकलन करण्याकरिता काही मजूर गेले. तेंदू पाने संकलन करीत असताना झुडपात लपून बसलेला रानडुकराने हल्ला चळविला.या हल्ल्यात कोरची इथून 15 किमी अंतरावर असलेल्या कोलूपदिकसा येथील दयाराम बुध्दू होळी वय 56 आणि हितकसा येथील दसरू सुखराम कचलामी हे गंभीर जखमी झाले.काही मजुरानी तातडीने या दोघांना कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल राऊत यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तालुक्यात रानडुकराने तेंदूपत्ता मजूरावर मागील चार दिवसापासून हल्ला करीत असल्याने मजुरामध्ये दहशतीचे वातावरण आहे. झालेल्या हल्ल्यात दि. 7 मे ला बेतकाठी येथील नंदकुमारी तेजराम बघवा वय 40 हे जखमी झाले. त्याच दिवशी बिहीटेकला येथील उर्मिला संतोष मिरी वय 48 ह्या जखमी झाले. 8 मे ला बेतकाठी येथील निराशा रवींद्र गुरवले वय 30 ह्या जखमी झाल्या. 9 मे ला भिमपूर येथील चंद्रप्रकाश गुलाब यादव वय 36 हे जखमी झाले होते. त्यानंतर 11 मे ला हल्ल्यात पुन्हा दोन व्यक्ती जखमी झाले. या सर्वांना ग्रामीण रुग्णालय कोरची येथे दाखल करण्यात आले.
ग्रामसभा आणि तेंदूपत्ता ठेकेदार यांच्यात झालेल्या करारानुसार तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या मजूराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबाला दिड लाख रुपये आणि जखमी झालेल्या मजूरांना पन्नास हजार रुपये औषधोपचार करण्यासाठी देण्याचा करार झाला असताना आज पर्यंत एकाही जखमींना तेंदूपत्ता ठेकेदाराकडून कोणत्याही प्रकारची मदत करण्यात आली नाही. तसेच वन विभागाकडून सुध्दा कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत करण्यात आली नाही. तेंदू पत्ता ठेकेदार आणि वन विभागाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी मजूर करीत आहेत.