
गडचिरोली:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीचा आराखडा मांडणारी धोरणात्मक आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पावसाळ्याच्या कालावधीमध्ये अचानकपणे पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही, यावर लक्ष ठेवावे. यासंदर्भात राज्य व जिल्हा स्तरावर समन्वय साधण्यासाठीची व्यवस्था उभी करण्यात आली आहे. ही व्यवस्था योग्यप्रकारे चालली पाहिजे, याकडे लक्ष द्यावे. पूर परिस्थितीमुळे संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये प्राथमिक गरजांची व्यवस्था प्रत्यक्षात झाल्याची खात्री करुन घ्यावी. तसेच यादरम्यान गर्भवती महिलांच्या व्यवस्थेकडे लक्ष द्यावे. सोबतच, गावांचा संपर्क तुटू नये यासाठी 5 टप्प्यातला कार्यक्रम राबवण्यात येत असून त्यातील किमान 2 टप्पे यावर्षी सुरु करण्यासाठी प्रयत्न करावे व आगामी 3-4 वर्षात उर्वरित टप्पे पूर्ण करावे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीदरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, एनएचआय यांनी लोकाभिमुखता राखून प्रकल्प पूर्ण करावे, प्रकल्पांना गती द्यावी, असे निर्देश दिले. तसेच वडसा ते गडचिरोली रेल्वे प्रकल्पासाठीचे भूसंपादन लवकरात लवकर पूर्ण करावे. माझ्या अजेंड्यावर गडचिरोली जिल्हा अग्रक्रमाने असून शासनाच्या सर्व विभागांनीदेखील गडचिरोली जिल्हा अग्रक्रमावर ठेऊन काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
यावेळी राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल, आ. डॉ. मिलिंद नरोटे, आ. धर्मरावबाबा आत्राम व इतर अधिकारी उपस्थित होते.