
शेतीच्या सातबारा अभावी तुमिरकसा गावातील शेतकरी अनेक योजना पासून वंचित.
अहेरी(गडचिरोली):– अहेरी तालुक्यातील तुमिरकसा गावातील शेतकऱ्यांना पट्याची वडिलोपार्जित स्वताची जमीन असूनही त्या जमिनीचा सातबारा करिता प्रत्येक कार्यालयाचे चकरा माराव्या लागत आहे.तरी पण सातबारा मिळत नसल्याने येथील शेतकऱ्यांना शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांच्याकडे निवेदन देत न्याय देण्याची मागणी केली आहे.
अति दुर्गम भागात असलेले तुमिरकसा हे गाव पेसा अंतर्गत येत असून सदर गाव मेडपल्ली ग्राम पंचायतीत समाविष्ट आहे. तुमिरकसा हे गाव महसूल विभागाचा नोंदणी मध्ये कासमपल्ली मसाहतच्या नावाने नोंद आहे.त्यानुसार 2020-21 या वर्षापर्यंत तलाठी कार्यालय मेडपली कडून तुमिरकसा गावातील शेतकऱ्यांना कासमपल्ली मसाहत या नावाने शेतीचे हस्तलिखित सातबारा ही देण्यात आले होते.परंतु सन- 2021नंतर तुमिरकसा गावातील शेतकऱ्यांना महसूल विभाग कडून कासमपल्ली मसाहत या नावाने हस्तलिखित किंवा ऑनलाईन सातबारा देणे बंद करण्यात आले.त्यामुळे गावातील शेतकऱ्यांना शासनाच्या अनेक योजनांपासून वंचीत राहावे लागत आहे.
महसुल विभागाकडून त्वरीत तुमिरकसा गावातील शेतकऱ्यांना कासमपल्ली मसाहत या नावाने हस्तलिखित किंवा ऑनलाईन सातबारा देण्याचे मंत्री महोदय यांनी निर्देश द्यावे.जेणेकरून शासनातर्फे राबवण्यात येणारे विविध योजनांचा लाभ घेता येईल,अशी मागणी शेतकऱ्यांनी आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांच्याकडे निवेदनातून विनंती केली आहे.
निवेदन देतांना मेडपल्ली ग्राम पंचायत सरपंच निलेश वेलादी, मल्लेश तलांडी,सामाजिक कार्यकर्ता बाबुराव तलांडी तसेच तुमिरकसा गावातील सर्व शेतकरी उपस्थित होते.