
मुंबई:- आतापर्यंत शालेय शिक्षण विभागापासून अलिप्त असलेल्या राज्यातील एक लाखांवर अंगणवाड्या आता प्राथमिक शाळांसोबत जोडल्या जाणार आहेत. नव्या शिक्षण धोरणातील आकृतिबंधानुसार 3 ते 6 वर्षे वयोगातील मुलांच्या शिक्षणावर भर देण्यासाठी हा बदल करण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षण मंत्रालय आणि महिला बालविकास मंत्रालयाने एकत्रित पाऊल उचलत संबंधित यंत्रणांना कार्यवाहीच्या लेखी सूचना केल्या आहेत
महाराष्ट्रात सध्या एक लाख 10 हजार 525 अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. तर एक लाख 8 हजार 237 शाळा आहेत. त्यातील 79 हजार 158 शाळांमध्ये प्राथमिकचे वर्ग आहेत. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार आता शालेय शिक्षणाचा आकृतिबंध बदलला आहे. पूर्व प्राथमिक शिक्षणाचे तीन वर्ग तसेच इयत्ता पहिली व दुसरी असे पाच वर्ष मिळून ‘पायाभूत शिक्षण’ हा स्तर निर्माण करण्यात आला आहे. परंतु, सध्या महाराष्ट्रात पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या अंगणवाड्या या महिला बालविकास विभागाच्या अखत्यारित आहेत. त्यामुळे ‘पायाभूत स्तरा’चे शिक्षण देताना अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे अंगणवाड्या प्राथमिक शाळांना जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार आणि महिला बालविकास मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक यांनी महाराष्ट्राला संयुक्त पत्र पाठविले असून त्यात अंगणवाडी व शाळांची ‘जोडणी’ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच यात अंगणवाडी सेविका आणि प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना स्वतंत्र प्रशिक्षण देण्याचीही सूचना करण्यात आली आहे. त्यासाठी महाराष्ट्रात शिक्षण तसेच महिला बालविकास खात्याचा समन्वय साधून एकत्रित काम करण्याचे निर्देश आहेत. आता या दोन्ही विभागातील यंत्रणांचा समन्वय राखण्याची जबाबदारी प्रत्येक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर येणार आहे.
चार वर्षापूर्वीच सुरु झाले प्रयत्न.
वास्तविक नवे शिक्षण धोरण येताच महाराष्ट्रात अंगणवाड्यांचे शाळांशी ‘लिंकिंग’ करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. तत्कालीन शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांनी मार्च 2021 मध्ये सर्व जिल्हा परिषदांना याबाबत सूचना दिल्या होत्या. परंतु सरकारी वकुबानुसार हे ‘लिंकिंग’ अजूनही झालेले नाही. आता खुद्द केंद्रातूनच पत्र धडकल्याने या कामाला नव्या सत्राच्या सुरुवातीलाच गती येण्याची शक्यता आहे. अंगणवाडी केंद्र शाळेशी जोडल्याने पहिल्या वर्गात दाखल होणारा विद्यार्थी ‘शिकण्यासाठी तयार’ अवस्थेत मिळेल, हा प्रशासनाचा दावा आहे.
अंणवाडीसेविकांना शिक्षकांसारखे प्रशिक्षण.
शाळा आणि अंगणवाडी केंद्र परस्परांशी जोडल्यानंतर अंगणवाडी सेविकांना प्राथमिक शिक्षकांप्रमाणे सेवांतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे. एससीईआरटी आणि डायटच्या माध्यमातून हे प्रशिक्षण होणार आहे. तसेच पूरक अध्यापन-अध्ययन साहित्य पुरविले जाणार आहे. समग्र शिक्षा अभियानातील विविध योजना अंगणवाडी केंद्रालाही लागू केल्या जातील.
कोणत्या जिल्ह्यात किती अंगणवाडी केंद्र ?
अहिल्यानगर : 5905, अकोला : 1564, अमरावती : 3189, छत्रपती संभाजीनगर : 3839, बीड: 3273, भंडारा : 1417, बुलडाणा : 2971, चंद्रपूर : 2962, धाराशिव : 2049, धुळे : 2328, गडचिरोली : 2386, गोंदिया : 1902, हिंगोली : 1197, जळगाव : 3944, जालना : 2190, कोल्हापूर : 4422, लातूर 2593, मुंबई शहर : 926, मुंबई उपनगर : 4221, नागपूर : 3404, नांदेड : 4165, नंदूरबार : 2563, नाशिक : 5699, पालघर : 3352, परभणी : 1844, पुणे : 6091, रायगड: 3389, रत्नागिरी : 2970, सांगली : 3107, सातारा : 4926, सिंधुदुर्ग : 1539, सोलापूर : 4735, ठाणे : 3541, वर्धा : 1627, वाशीम :1266, यवतमाळ : 3029, एकूण महाराष्ट्र : 1,10,525