देशात पहिल्या LPG एटीएमची सुरूवात, रिकामी टाकी आणा आणि… मिनिटात भरून न्या!
जया लाभसेटवार
उपसंपादिका
मुंबई:- मध्य-पूर्वेतील युद्धाचा थेट परिणाम इंधन आणि गॅस संकटाच्या रुपाने होत आहे. देशात पेट्रोल-डिझेल नाही तर गॅस टंचाई दिसून येत आहे. गेल्या पाच दिवसांपासून देशातील अनेक नागरिक लांबच लांब रांगेत रोज उभे राहत आहेत. त्यांना एलपीजी सिलेंडर मिळण्याची अजूनही शाश्वती वाटत नाही. तर सरकारने तुटवडा नसल्याचा दावा केला आहे. पुरवठा विस्कळीत झाल्याने गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहे. दरम्यान आता गॅस संकटावर अजून एक उपाय समोर आला आहे. नवी दिल्लीजवळील गुरुग्राममध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (BPCL) एलपीजी एटीएमची सुरुवात केली आहे. हा एक पथदर्शी प्रकल्प असून लवकरच देशातील अनेक शहरात असे एलपीजी एटीएम सुरू होण्याची शक्यता आहे.
देशात एलपीजी पुरवठा विस्कळीत होऊ नये आणि गरजूंना गॅस मिळवा यासाठी सरकारने एलपीजी पुरवठ्याविषयीच्या नियमात मोठे बदल केले. बुकिंगविषयीचे नियम आणि कालावधी वाढवला. त्याचा उलटा परिणाम झाला. ग्राहकांनी थेट गॅस एजन्सीवर धडक दिली. गॅस पुरवठा होणार नसल्याचा संदेशच यातून गेला. नैसर्गिक गॅसची नवीन खेप गुजरात बंदरावर दाखल झाली आहे. तर सरकारी आणि खासगी कंपन्यांनी गॅस उत्पादन वाढवले आहे. तरीही परिस्थिती पूर्व पदावर येण्यासाठी कालावधी लागणार असल्याचे सध्याच्या चित्रावरून दिसत आहे. त्यामुळे ग्राहक अधिक पॅनिक झाले आहे. त्यांना रोजच्या जेवणाची चिंता लागली आहे. यावर सरकारने अजून उपाय करण्याची मागणी करण्यात येत आहे.
गुरुग्राममधील सोहाना येथील सेक्टर -33 मध्ये पहिले एलपीजी एटीएम
सध्याच्या या परिस्थितीत बीपीसीएलने एक चांगला निर्णय घेतला आहे. गुरुग्राममधील सोहाना येथील सेक्टर -33 मध्ये एका रहिवासी भागात एलपीजी एटीएमची सुरुवात करण्यात आली आहे. हे ऑटोमॅटिक एलपीजी वेंडिंग सिस्टिम लोकांच्या मदतीला येणार आहे. रिकामे सिलेंडर आणून ग्राहकांना ते भरून घेता येईल. कंम्पोझिट सिलेंडर भरण्यासाठी जास्तीत जास्त तीन मिनिटांचा कालावधी लागेल. पाण्याच्या जारप्रमाणे लोकांना आता गॅस सिलेंडर भरून घेता येईल. त्यासाठी एलपीजी गॅस एजन्सीवर जाण्याची अथवा गॅस घरपोच येण्याची वाट पाहावी लागणार नाही. हे एलपीजी एटीएम सातही दिवस 24 तास सुरू असेल.
