
मुंबई:- राज्यातील उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयातील सन २००३-०४ ते सन २०१८-१९ या कालावधीतील वाढीव पदांवरील कार्यरत असलेल्या एकूण २४९ पात्र शिक्षकांचे समायोजन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याबाबतचा शालेय शिक्षण विभागाकडून शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
गेली पंधरा ते वीस वर्षे शिक्षण सेवेत वाहून घेतलेल्या २४९ शिक्षकांना अद्याप सामावून घेण्यात आले नव्हते. मात्र, उशीरा का होईना सरकारला जाग आली, अन् या शिक्षकांना सामावून घेतले त्यामुळे या शिक्षकांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.
वाढीव पदांवर कार्यरत असलेल्या एकूण २४९ समायोजनास पात्र शिक्षकांबद्दल हा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव आबासााहेब आवळे यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. त्यानंतर आता लवकरच मंत्री दादा भुसे यांच्याकडून आदेश प्रदान केले जातील. वाढीव पदावर समायोजन केलेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
मान्यताप्राप्त खासगी अनुदानित उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे वाढलेल्या अतिरिक्त कार्यभारानुसार पायाभूत पदांपेक्षा अतिरिक्त शिक्षक पदे मंजूर करण्याबाबतचे प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाले होते. सन २००३-०४ पासून २०१८-१९ पर्यंत वाढीव कार्यभारानुसार अतिरिक्त वाढीव पदे मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन होता. या कालावधीतील वाढीव पदांवर कार्यरत असलेल्या एकूण २४९ पात्र शिक्षकांचे समायोजन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.