
मुंबईत 5 आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना कॅम्पस स्थापन करण्यासाठी ‘लेटर ऑफ इंटेंट’ (उद्दिष्टपत्र) देण्याची ही पहिलीच घटना.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदाबाद-लंडन विमान अपघातसारख्या कठीण प्रसंगी भारताच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल जागतिक समुदायाचे आभार मानले.
मुंबई:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रात कॅम्पस स्थापन करण्यासाठी 5 आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना ‘लेटर ऑफ इंटेंट’ (LOIs) प्रदान केले. हा कार्यक्रम ‘मुंबई रायझिंग – क्रिएटिंग अॅन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी’ अभियानांतर्गत आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदाबाद-लंडन विमान अपघातसारख्या कठीण प्रसंगी भारताच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल जागतिक समुदायाचे आभार मानले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत भारतीय उच्च शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. मुंबईत या 5 आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना कॅम्पस स्थापन करण्यासाठी ‘लेटर ऑफ इंटेंट’ (उद्दिष्टपत्र) देण्याची ही पहिलीच घटना असून, यामुळे मुंबईचा ठसा जागतिक शैक्षणिक नकाशावर उमटणार आहे. या पुढाकाराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) यांना धन्यवाद.
स्कॉटलंड येथील युनिव्हर्सिटी ऑफ अॅबर्डीनला 500 वर्षांचा समृद्ध शैक्षणिक वारसा लाभलेला असून इंग्लंड येथील युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क संशोधन व व्यापक ज्ञानशाखांतील शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. शिकागो येथील इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवउद्योजकता क्षेत्रातील अग्रणी संस्था असून द युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे खाणउद्योग, जीवनशास्त्र व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाविन्यपूर्ण संशोधनात विशेष योगदान आहे. मिलान येथील इस्तितूतो युरोपिओ दी डिझाईन इटालियन डिझाईनची अभिजातता व सर्जनशीलता भारतीय भूमीत घेऊन येणार आहे. या सर्व विद्यापीठांचे भारताची आर्थिक, औद्योगिक आणि मनोरंजनाची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये स्वागत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र आणि मुंबई यांना जागतिक दर्जाचे शैक्षणिक केंद्र बनवण्याची आपली दीर्घकाळापासून आकांक्षा होती. याच विचारातून ‘एज्युसिटी’ची संकल्पना उदयास आली. सिडको आणि नगर विकास विभागाच्या मदतीने अगदी अल्पावधीत नवी मुंबई विमानतळाजवळ या एज्युसिटीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली. अटल सेतूच्या माध्यमातून ही एज्युसिटी फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर असल्याने ती दक्षिण मुंबईचेच विस्तारित रूप ठरणार आहे. याशिवाय, आपण मेडिसिटी, स्पोर्टस् सिटी आणि इनोव्हेशन सिटी तयार करत आहोत. इनोव्हेशन सिटीमध्ये नवकल्पनांची एक संपूर्ण परिसंस्था विकसित होणार असून, पुढील पिढीच्या तंत्रज्ञानाचा व इनोव्हेशनचा उदय इथूनच होईल. ही 5 विद्यापीठे या इनोव्हेशन सिटीच्या जवळ असल्यामुळे, एक वेगळीच ‘थ्राईव्हिंग इकोसिस्टीम’ तयार होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांच्या आगमनामुळे, केवळ भारतीय विद्यार्थ्यांनाच नव्हे तर भारतात शिक्षण घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाचे शिक्षण स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहे. यामुळे आर्थिक अडचणींमुळे परदेशात जाऊ न शकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या दरात जागतिक शिक्षणाची संधी मिळणार आहे. संपूर्ण परिसंस्था येथेच तयार झाली असून, एकही विद्यार्थी जागतिक शिक्षणापासून वंचित राहणार नाही. कोणाचेही स्वप्न अपूर्ण राहणार नाही, ते इथेच पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आज या एज्युसिटीमध्ये 5 आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना ‘लेटर ऑफ इंटेंट’ (LOIs) देण्यात आले आहेत. पण आपण येथेच थांबणार नाही. केंद्रीय शिक्षण मंत्री आणि युजीसीच्या मदतीने आपण नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यापीठांची सर्वात मोठी परिसंस्था निर्माण करणार आहोत. ‘सा विद्या या विमुक्तये’ या संस्कृत वचनाचा अर्थ ज्ञान हेच खरे मुक्त करणारे असते, असा आहे. या विद्यापीठांद्वारे आपण केवळ शिक्षण देत नाही, तर सामर्थ्य, स्वप्न आणि भविष्य सर्वांसाठी खुले करत आहोत. भारत आता केवळ जागतिक शिक्षणाचा ग्राहक राहणार नाही, तर तो जागतिक भविष्य घडवणारा को-क्रिएटर ठरणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) सचिव, उच्च शिक्षण व अध्यक्ष विनीत जोशी, अॅबर्डीन विद्यापीठाचे उपप्राचार्य, जागतिक सहभाग प्रा. सिलादित्य भट्टाचार्य, यॉर्क विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. चार्ली जेफ्री, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठाचे उपकुलगुरू गाय लिटलफेअर, इलिनॉय टेकचे अध्यक्ष राज एकचांबडी, इस्तितुतो युरोपिओ दी डिझाईनचे अधिष्ठाता रिकार्डो बाल्बो, भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन, ऑस्ट्रेलियाचे महावाणिज्यदूत पॉल मर्फी, अमेरिकेचे महावाणिज्यदूत माईक हँकी, इटलीचे महावाणिज्यदूत वाल्टर फेरारा व इतर मान्यवर उपस्थित होते.