
उत्तर प्रदेश:- सासूच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असलेल्या महिलेला वाचविण्याचा प्रयत्न करत असताना गाझियाबाद चे वाहतूक पोलीस दलातील हवालदार अंकित तोमर यांना स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. तोमर यांच्या प्रयत्नामुळे आत्महत्या करत असलेल्या महिलेचे प्राण वाचविण्यात यश आले.मात्र त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला. या घटनेनंतर गाझियाबादसह संपूर्ण उत्तर प्रदेश पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
वैशाली येथे असलेल्या हिंदन कालव्यातील पुलावरून एका महिलेने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने कालव्यात उडी घेतली. २८ वर्षीय अंकित तोमर हे काही अंतरावर होते. अवघ्या २८ सेकंदात त्यांनी पुलाजवळ पोहचून कालव्यात उडी घेतली आणि आत्महत्या करणाऱ्या महिलेला वाचविण्याचा प्रयत्न केल. मात्र तोमर यांना पोहता येत नसल्यामुळे ते दुर्दैवाने पाण्यात बुडाले.
तोमर यांच्या मृत्यूनंतर ट्रान्स-हिंदनचे पोलीस उपायुक्त निमिष पाटील यांनी म्हटले की, पोलीस दल शासकीय इतमामात अंकित तोमर यांच्यावर अंत्यसंस्कार करेल. निमिष पाटील पुढे म्हणाले, १७ मे रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास महिलेने आत्महत्या करण्यासाठी कालव्यात उडी घेतली होती. त्यापाठोपाठ तोमर यांनीही उडी मारली. इतरांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी बचाव कार्य सुरू केले. तोमर यांना शोधण्यासाठी तब्बल दोन लागले.कोसंबी पोलीस ठाण्याचे अधिकारी अजय कुमार शर्मा यांनी द इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना सांगितले की, तोमर यांना कालव्यातून बाहेर काढले तेव्हा आम्हाला वाटले की, तो श्वास घेत आहे. आम्ही त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तोमर २०१६ साली पोलीस दलात दाखल झाले होते.